नवी दिल्ली : शेतीमध्ये लक्षणीय प्रगती करणारे शेतकरी व संस्था यांना देण्यात येणाऱ्या महिंद्रा समृद्धी इंडिया अॅग्री अॅवॉर्ड्सचा वितरण सोहळा येत्या १८ मार्च रोजी, नवी दिल्ली येथे होणार आहे. यंदाचे पुरस्कारांचे हे नववे वर्ष आहे. नावीन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतीची उत्पादकता वाढवून ग्रामीण भागात भरभराट आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या महिंद्राच्या समृद्धी उपक्रमाअंतर्गत हे पुरस्कार देण्यात येतात.
या पुरस्कारांच्या निमित्ताने, २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ‘फार्मिंग 3.0’ बद्दलची कंपनीची बांधिलकीही अधोरेखित होणार आहे. उत्पादकता व अर्थकारण आणि सामाजिक व पर्यावरणीय घटक यांचा समतोल साधतील, अशा उपक्रमांद्वारे शेती शाश्वत बनवणे हे ‘फार्मिंग 3.0’ चे उद्दिष्ट आहे. गेल्या काही वर्षांत या पुरस्कारांना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये व सहभागींमध्ये वाढ होत आहे. या पुरस्कारांसाठी शेतकरी व बिगर-शेतकरी श्रेणींतून देशभरातून ६३ हजार ७५८ अर्ज आले असून, गेल्या वर्षी ही संख्या ६२ हजार ९१६ होती.
महिंद्रा समृद्धी इंडिया अॅग्री अॅवॉर्ड्समध्ये महिंद्रा समृद्धी कृषक सम्राट सन्मान, कृषी प्रेरणा सन्मान, कृषी युवा सन्मान, कृषी सम्राट सन्मान, कृषी संस्था सन्मान, कृषी शिक्षण सन्मान, कृषी विज्ञान केंद्र सन्मान, कृषी सहयोग सन्मान, कृषी शिरोमणी सन्मान हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.